कायमस्वरूपी करमाफी, लाईट, पाणी फुकट असलेले गाव मान्याचीवाडी
२००० सालापासून सातत्याने गावाच्या सर्वांगीण विकासात अव्वल स्थानी असलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत देशात सर्वोत्तम ठरली आहे.
सातारा : २००० सालापासून सातत्याने गावाच्या सर्वांगीण विकासात अव्वल स्थानी असलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत देशात सर्वोत्तम ठरली आहे. आजपर्यंत तब्बल ७८ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या या ग्रामपंचायतीची यशोगाथा सरपंच रविंद्र माने यांच्याकडून देगांव (सातारा) येथे शनिवार दि.१ फेब्रुवारी रोजी प्रकट मुलाखतीतून उलगडणार आहे.
राजकीय पटलावर वेगळी ओळख निर्माण असलेल्या सातारा तालुक्यातील देगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प दि.२८ जानेवारी पासून सुरु झाला आहे. या कॅम्पमध्ये शनिवार दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७:३० यावेळी रविंद्र माने यांची पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव हे प्रकट मुलाखत घेणार आहेत.
या गावाने प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन देशात सर्वोत्तम कामगिरी करून विविध पुरस्कार पटकाविले आहेत. यातून "यशोगाथा मान्याच्यावाडीची" ही. कायमस्वरूपी करमाफी देणाऱ्या या गावात आता लाईट फुकट, पाणीपट्टी माफ करणाऱ्या या ग्रामपंचायतीची प्रथमच जाहीरपणे यशोगाथा उलगडणार आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेज कडून देगांव गाव आदर्श करण्यासाठी यापुढे सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी रविंद्र माने यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणार असून या कार्यक्रमावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच वैशाली साळुंखे आणि प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी केले आहे.