आईच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी मराठमोळे जज SC मध्ये ऑन ड्युटी!
नोकरीचा अखेरचा दिवस... ज्या नोकरीनं, ज्या कामानं आर्थिक सुबत्ता, मानसन्मान दिला त्या नोकरीच्या अखेरच्या दिवसाप्रतीसुद्धा कमालीची कृतज्ञता असते.
दिल्ली : नोकरीचा अखेरचा दिवस... ज्या नोकरीनं, ज्या कामानं आर्थिक सुबत्ता, मानसन्मान दिला त्या नोकरीच्या अखेरच्या दिवसाप्रतीसुद्धा कमालीची कृतज्ञता असते. ही भावना कोणा एकाची नसून कैक वर्षे एका क्षेत्रात आणि एके ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात असते. सध्या देशभरात अशाच एका महत्त्वाच्या पदावर सेवेत असणाऱ्या तितक्याच महत्त्वाच्या आणि मराठमोळ्या व्यक्तीची चर्चा सुरू आहे. ही व्यक्ती आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक.
सहसा सर्वोच्च न्यायालयात कामकाज सेवेच्या अखेरच्या दिवशी कोणतेही न्यायमूर्ती कोणत्याही खटल्यावर निकाल सुनावत नाहीत. सुनावणी घेत नाहीत. मात्र न्यायमूर्ती ओक यांनी कैक वर्षांपासून सुरू असणारी ही परंपरा मोडित काढली आणि आपल्या कर्तव्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी विविध खंडपीठांच्या जवळपास 11 प्रकरणांची सुनावणी करत निकाल दिला.
आईचं निधन झालेलं असतानाही दुसऱ्याच दिवशी कर्तव्याचा शेवटचा दिवस म्हणून ते न्यायालयात उपस्थित झाले आणि लगेचच पदभार सांभाळून सुनावणी केली. गुरुवारी ओक मुंबईत आईच्या अंत्यविधींसाठी पोहोचले आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयातील सेवेच्या अखेरच्या दिवशी ते दिल्लीला रवाना झाले.
आपल्याला रिटायरमेंट, निवृत्ती, अशा शब्दांची चीड येते सांगताना न्यायमूर्तींनी कामकाजाच्या अखेरच्या दिवशीसुद्धा सेवेत हजर होत खंडपीठाचा एक भाग असलं पाहिजे आणि याच धारणेतून आपण अखेरच्या दिवशी सुनावणीमध्ये सहभागी होत सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या खंडपीठाचा एक भाग झालो असं ओक यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायासलयामध्ये कोणत्याही न्यायाधीशाच्या निवृत्तीवेळी सरन्यायाधीशांच्या खंडपीठाखाली प्रतिकात्मक खंडपीठ बसतं आणि न्यायमूर्तींना आदरपूर्वक निरोप दिला जातो, कैक वर्षांपासून देशाच्या या सर्वोच्च न्यायालयामध्ये ही परंपरा पार पडतेय.
न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सेवेतील अखेरच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात एक निरोपसमारंभपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना न्यायमूर्ती ओक यांनी अतिशय महत्त्वाचा संदेश देत सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयात अधिक प्रमाणात लोकशाही मार्गानं काम होतं असं म्हणत उच्च न्यायालयातील कामकाज प्रक्रिया विविध समित्यांवर अवलंबून असून सर्वोच्च न्यायालयातील कामकाज सरन्यायाधीश केंद्रीत असल्यानं या कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट मत त्यांनी सेवेच्या अखेरच्या दिवशी म्हटलं.