वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात धरणे आंदोलन
बौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे.
सातारा : बौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीने जिल्हा महासचिव गणेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले या आंदोलनाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद आहे की गया येथील बोधिवृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली. जगभरातील बौद्ध अनुयायी आणि पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1992 पासून आंदोलने सुरू आहेत मात्र व्यवस्थापनाने बदल केलेला नाही. ज्या कर्मकांडांना गौतम बुद्धांनी नाकारले ती येथे सुरू आहेत, त्यामुळे महाविहार कायदा 1949 रद्द करावा. महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध आचार्यांना सोबत घेऊन करावे जागतिक वारसा कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विशेष विकास निधी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आले आहेत.
या निवेदनावर भीमराव घोरपडे अरविंद आढाव शरद गाडे मोरे नंदा सर्जे बाळासाहेब तापकिरे बापू किरवे हनुमंत तोरणे शैला सोनवणे जयश्री समिंदर सुमन शिंदे प्रताप सपकाळ यांच्या स्वाक्षरी आहेत.