शासनाने शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेनुसार साजरा करावा
सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेवर साजरा करावा, अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेवर साजरा करावा, अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर यावा यासाठी भारतीय रक्षक आघाडी व इतर परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून किल्ले प्रतापगड येथे तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा करीत आहे. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजल खान व त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा वध छत्रपती शिवरायांनी स्वत: केला. त्याचे ऐतिहासिक पुरावे सर्वांना माहीत आहे. असे असतानाही गेले अनेक वर्ष जिल्हा प्रशासन शिवप्रताप दिन तारखेनुसार साजरा न करता तिथीप्रमाणे साजरा करते. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अपमान करणारे असून सर्व शिवप्रेमींची भावना दुखावणारे देखील आहे.
या विषयाला अनुसरून सातारा जिल्हाधिकारी प्रशासनाने शिवप्रताप दिन तारखेनुसारच साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासन तारखेनुसार करते तर मग शिवप्रतापदिन तिथीप्रमाणे का? शिवप्रताप दिन सुद्धा तारखेनुसारच व्हावा अशी मागणी भारतीय रक्षक आघाडी मागील अनेक वर्षांपासून करत आहे. या संदर्भात अॅड. अनंत दारवटकर यांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०१८ रोजी सातारा जिल्हाधिकारी नोटीसीद्वारे सूचना करण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा त्यांनी काहीही कार्यवाही केली नाही. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ताबडतोब बदली करावी, अशी मागणी सुद्धा यावेळी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी केली.