सातारा शहराच्या शाश्वत विकासासाठी भाजपलाच विजयी करा
तुम्हीही साताऱ्यात राहता आणि मीही साताऱ्यातच राहतो. आपला सर्वांचा शेवट साताऱ्यातच होणार आहे. सातारकर म्हणून आपण सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकवटले पाहिजे.
सातारा : तुम्हीही साताऱ्यात राहता आणि मीही साताऱ्यातच राहतो. आपला सर्वांचा शेवट साताऱ्यातच होणार आहे. सातारकर म्हणून आपण सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकवटले पाहिजे. बाहेरच्यांनी येऊन आम्हा सातारकरांना तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारमुळे साताऱ्याच्या विकासासाठी सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि सातारा शहराच्या शाश्वत विकासासाठी भाजपलाच विजयी करा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारकरांना केले.
सातारा नगर पालिका निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमोल मोहिते आणि नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त गांधी मैदान ते शिवतीर्थ पोवई नाका अशी भव्य पदयात्रा ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थिती काढण्यात आली. पदयात्रेत सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. पदयात्रा मोती चौक मार्गे खालच्या रस्त्याने पोवई नाक्यावर आली. पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. पोवई नाक्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेचे सांगता सभेत रूपांतर झाले. या सभेत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
याप्रसंगी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, डॉ. प्रिया शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणुकीपुरता ज्यांना सातारकरांचा कळवळा आला आहे, त्या शशिकांत शिंदे यांनी देगाव येथील प्रस्तावित एमएडीसी घालवली, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आज सातारा येथे आयटी पार्क निर्माण होत आहे. शहरातील रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. कास धरणाची उंची वाढवली असून मुबलक पाणी सातारकरांना मिळणार आहे. हद्दवाढ करून उपनगरे आणि त्रिशंकू भाग विकासाच्या प्रवाहात आणला आहे. असंख्य विकासकामे आपण मार्गी लावली आहेत.
'अ' वर्ग नगर पालिका महानगर पालिका झाल्यास अधिकचा निधी शहराच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे. असे असताना नगराध्यक्ष पदाचे काही अपक्ष उमेदवार अकलेचे तारे तोडताना दिसत आहेत. तीन स्वतंत्र नगरपंचायती केल्या पाहिजेत असे ते म्हणत असतील तर यांना शहराच्या विकासाबद्दल किती कळतं हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सातारकरांनी कोणाचाही विचार न करता भाजपच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना कमळ आणि आपला मित्र पक्ष आरपीआयच्या एका उमेदवाराला टोपी या चिन्हावर मतदान करून पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करावे. लोकसभेला आपण सातारकर म्हणून आपली ताकद दाखवून दिली, उदयनराजेंना खासदार करून दिल्लीला पाठवले. आत्ताही भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष सातारा पालिकेच्या निवडणुकीवर आहे. त्यामुळे तुझं माझं न करता, वॉर्डातील भांडण मनात न ठेवता, गटतट न बघता भाजपच्या उमेदवारालाच मतदान करा. चुकीचं काही झालं तर काळ आपल्याला माफ करणार नाही याचे भान ठेवून सर्वांनी अमोल मोहिते आणि त्यांचे सहकारी अधिकृत उमेदवार यांनाच मतदान करून पुन्हा एकदा सातारकरांची ताकद महाराष्ट्राला दाखवून द्या, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.