एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३० टक्के वाढ होणार
पारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते. ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांनी ५ वर्षे संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेवून एआय तंत्रानाच्या वापराने उत्पादनात वाढ होते हे सिध्द केले आहे.
सातारा : पारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते. ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांनी ५ वर्षे संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेवून एआय तंत्रानाच्या वापराने उत्पादनात वाढ होते हे सिध्द केले आहे. सदर तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता मायक्रोसॉफ्ट कंपनी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मॅप माय क्रॉप, फसल व सिमू सॉफ्ट आदी कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस पिकासह सर्व पिकांच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ. विवेक भिते यांनी केले.
ऊस पिकाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे व साखर कारखान्याचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे आणि ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेला होता. याप्रसंगी डॉ. भोईटे बोलत होते.
ऊस पिकाचा डाटा उलब्ध असल्यामुळे आणि साखर कारखाने व शेतकरी यांचे योग्य समन्वय असल्यामुळे सदर तंत्रज्ञानाचा वापर करणे सोयीचे होईल. या तंत्रज्ञानाद्वारे वाऱ्याचा वेग, पाऊस, प्रकाशाची तीव्रता, जमीनीतील आर्द्रता, पिकास केंव्हा व किती पाणी द्यावे, कोणते खत किती द्यावे, कोणता रोग येण्याची शक्यता आहे, रोग कोणत्या ठिकाणी आला आहे, त्यावर कोणते औषध किती फवारावे, ऊसाची वाढ कशी आहे, ऊस कधी पक्व होईल, किती साखरेचा उतारा मिळेल, किती उत्पादन मिळेल आदी सर्व बाबींची माहिती अगोदरच मिळते. ऊस वाढीसाठी सुरुवातीला खते न देता चौथ्या महिन्या पासून बारा महिन्या पर्यंत आवश्यकतेनुसार दिले तर उत्पादन वाढते, त्यासाठी ड्रीपने पाणी देण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी, खते आणि मजूरीचे खर्चात बचत होते. तसेच ऊसाचे ३० टक्के उत्पादन वाढवता येते, असे डॉ.विवेक भोईटे यांनी यावेळी सांगीतले.