सातारा : राज्यात अडीच वर्ष सत्तेत असून देखील महायुती सरकारने रयत क्रांती संघटनेला सातारा जिल्ह्यात सातत्याने दुर्लक्षित केले आहे. जिल्ह्यात कोणत्याही शासकीय समित्यांवर संधी देण्यात आली नाही. उलट निवडणुका आल्या की केवळ वापरून घेण्याचा महायुतीचा प्रयत्न राहिला आहे. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचा कोणताही वापर आम्ही होऊ देणार नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा आम्ही स्वबळावर लढविणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आणण्यात आमचे नेते आ.सदाभाऊ खोत यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. तिन्ही लोकसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता जोरदार प्रचार केला. मात्र, त्या मोबदल्यात महायुतीकडून कोणतेही महत्वाचे स्थान दिले गेले नाही. साध्या जिल्हा नियोजन समिती तसेच तत्सम शासकीय समित्यांवर सदस्य देखील म्हणून नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटना वेगळा विचार करणार असून कोणत्याही परिस्थिती सातारा जिल्ह्यातील आठ ही विधानसभा मतदार संघात स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत. लवकरच सातारा विश्रामगृह येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी सांगितले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महायुती व महाविकास या दोन्ही आघाडीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असून त्यासाठी रयत क्रांती संघटनेने जोरदार बांधणी सुरू केली आहे. तसेच आ.सदाभाऊ खोत व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा संपूर्ण सातारा जिल्ह्यात झंझावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी सांगितले.