परतीच्या पावसाने साताऱ्यात पुन्हा दाणादाण
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून उघडी घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार हजेरी लावत सर्व भागाला झोडपून काढले.
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून उघडी घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार हजेरी लावत सर्व भागाला झोडपून काढले. खरीप हंगाम आधीच वाया गेलेला असताना परतीच्या पावसाने ही उरलेसुरले पिक हातात जाण्याच्या शक्यतेने बळीराजा पुन्हा आक्रंदला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह वाई, पाटण, कराड, सातारा या भागांमध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारनंतर ढगाळुन आलेल्या पावसाने सातारकरांची दैना उडवली. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. सातारा शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरामध्ये नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. विशेष करून दांडियाचे कार्यक्रम सुरू असताना रात्री उशिरा पावसाने त्यांच्यावर पाणी फिरवले. सकाळी पावसाने उघडी घेतली होती. नोकरदार मंडळींना कामावर जाताना पावसात भिजल्याने त्यांचे हाल झाले. विद्यार्थ्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागले. जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाची रिप्रीप झाल्याचे वृत्त आहे. मान तालुक्यातील 106 हेक्टरवरील डाळिंबाचे क्षेत्र नुकसानीत गेले आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात 97% पेरणी झाली असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र बहुतांश पीक हे वाया गेल्याचे चिन्ह आहे. जावळी तालुक्यातही भात लागण्याची कामे प्रगतीपथावर होती, मात्र गेल्या दोन दिवसापासून तेथेही पावसाचा जोर असल्याने हे सुद्धा पीक हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे. शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस असाच राहणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत. त्यामुळे पुढील आठवडा सुद्धा हा पावसाचा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.