शून्य शिक्षक नियमाच्या विरोधात शिक्षक शिक्षकेतर संघटना आक्रमक
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या शाळांमध्ये पटसंख्या अभावी त्या शाळेचे वर्ग शून्य शिक्षक ठरवून बंद करणे व त्या पद्धतीची संचमान्यता नियमित करणे या अन्यायकारक नियमाच्या विरोधात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेने दंड थोपटले आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या शाळांमध्ये पटसंख्या अभावी त्या शाळेचे वर्ग शून्य शिक्षक ठरवून बंद करणे व त्या पद्धतीची संचमान्यता नियमित करणे या अन्यायकारक नियमाच्या विरोधात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेने दंड थोपटले आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या नियमाच्या विरोधात या संघटनांनी साताऱ्यामध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे, याची माहिती संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात व महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे,प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भरत जगताप , सातारा जिल्हा ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष सी के सावंत इत्यादी यावेळी उपस्थित होते.
सचिन नलावडे पुढे म्हणाले 15 मार्च 2024 रोजी संच मान्यते संदर्भातील काही तरतुदी अत्यंत अन्यायकारक आहेत. माध्यमिक मध्ये नववी दहावी या वर्गांवर वीस पेक्षा कमी पट असल्यास त्या इयत्ता शून्य शिक्षक ठरवून बंद करणे असा नियम ठरवण्यात आला आहे. या नियमामुळे सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा 59 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे सामान्य तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद होणार आहेत राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पद भरती बाबत 28 मे 2025 रोजी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात यावेत,शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करावे, वर्षातून दोनदा किमान शिक्षक भरती करावी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर 2005 पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करावी ,14 ऑक्टोबर 2024 प्रमाणे शासनाने टप्पा अनुदान तातडीने वितरित करावे ,शाळांचे वेतन इतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या पद्धतीने मिळावे या प्रश्नांवर अद्याप शासनाने उत्तरे दिलेली नाहीत.
या समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रात मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनांचे सत्र सुरू होणार आहे .सातारा जिल्ह्यात 11 जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .हा मोर्चा राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय यामार्गाने काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये वेगवेगळ्या संघटनांचे किमान 1000 कर्मचारी सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .