काही झाले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार
तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले.
सातारा : तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव चे आमदार दीपक चव्हाण यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेपूर्वी आमदार रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांची एकत्र बैठक झाली. मात्र त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या गटाने प्रवेश केला मात्र आमदार रामराजे यांनी प्रवेश केला नाही.
त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य उभारणीमध्ये फलटणकर यांचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्र योग्य व्यक्तींच्या हातात द्यायचा आहे. म्हणून ही लढाई सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच २०१४ पासून पाच वर्ष राज्य होतं. तेव्हा त्यांना बहीण दिसली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडी जिंकल्यानंतर यांना सर्व समाज आणि लाडक्या बहिणी आठवल्या. राजकारण्यांपेक्षा लोक अधिक शहाणे आहेत. त्यांना कळतं, कोणत्या वेळी काय करायचं आहे ते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता योग्य तो निर्णय यावेळी घेणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे.
मी स्वतः काही निवडणुकीला उमेदवार नाही. परंतु महाराष्ट्राची जी वाईट परिस्थिती या लोकांनी केली आहे. ती काढून योग्य व्यक्तीकडे सत्ता देण्यासाठी आत्ताची लढाई आहे. राज्यातील लोकांनी मला चार वेळा मुख्यमंत्री केले. मी सतत लोकांचा आणि समाजाचा भलं केलं आहे. मला महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचं आहे, म्हणून आता सत्ता बदल अटळ असल्याचे ते म्हणाले. फलटण येथे कमिंस ही अमेरिकन कंपनी मी मुख्यमंत्री असताना त्या लोकांना फलटण येथे उद्योग उभारण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्राची चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता आहे. यांना आया बहिणीची काळजी नाही. त्यांची सुरक्षा तुम्ही करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की, आजचे राज्यकर्ते आया बहिणींची काळजी घ्यायला खंबीर आणि गंभीर नाहीत. महाराष्ट्रात कोणतीही कायदा सुव्यवस्था नाही. सामान्य माणसाला सन्मानाने जगता येत नाही. हे राज्य पुढे न्यायचे आहे. त्यांचे हात वेगवेगळ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संरक्षण करता येत नाही राज्यभर, मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यापासून अनेक ठिकाणी मागील शंभर वर्षांपासून पुतळे आहेत. परंतु या पुतळ्यांना कोणताही धोका पोहोचत नाही किंवा धक्का लागत नाही. आजही ते ऊन वारा पावसामध्ये उभे आहेत. कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जोरदार वाऱ्यामुळे उध्वस्त होतो. पुतळा उभारताना या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. सर्वसामान्य माणसांनी आता यांच्या हातातून सत्ता काढून घेणे गरजेचे झालेले आहे. हेच काम संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ घातला आहे. माझं वय ८४ झाले असले, तरी मी काही म्हातारा झालो नाही. मलाही अजून खूप काही जगायचे आहे आणि काम करायचे आहे. येथील सामान्य माणसाला जोपर्यंत सन्मान मिळवून देत नाही. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. योग्य लोकांच्या हातात सत्ता देत नाही तोपर्यंत मलाही समाधान मिळणार नाही. या निवडणुकीत देशभर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आवाज पोहोचल्याशिवाय राहणार नाही असेही शेवटी पवार म्हणाले.
फलटण येथे कार्यकर्त्यांवर किती अन्याय झाला आहे ते मला माहित आहे. फलटणकर यांनी किती अन्याय सहन केला हेही मला माहित आहे. भूलथापांना बळी पडून, नुसत्या घोषणा आणि निवडणुकीचे जूमले बांधण्यात समोरचे लोक व्यस्त आहेत. तुम्ही जागरूक राहा. त्यांच्या नादी लागू नका असे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही. विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यामुळे फलटण सह खटाव माण व सातारा जिल्ह्यात वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांचे प्रभावी भाषण झाले. उत्तम जानकर, धैर्यशील मोहिते पाटील त्यांनीही मनोगत व्यक्त केले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. महिलाही सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.