राज्यात उन्हाचा चटका, किती दिवस असणार वाढलेले तापमान,
राज्यातील तापमानात अचानक बदल झाला आहे. दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे.
हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन दिवस 34 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. तापमानातील ही वाढ उत्तर भारतामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे झाली आहे. अजून दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
राज्यात सध्या दिवसा कडक ऊन जाणवत आहे. तसेच रात्रीच्या वेळी थंडी वाढत आहे. त्यामुळे विचित्र वातावरणाचा सामाना नागरिकांना करावा लागत आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर तापमान वाढ होत असते. परंतु यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील झालेल्या हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारण दोन-तीन दिवस असणारा आहे. गेल्या २४ तासांत सोलापूरसोबत, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागातील तापमान ३६ अंशावर गेले.